महापौर श्रीम सुजाता पाटील यांनी विविध ठिकाणी भेटी देत केली पावसाळी स्थितीची प्रत्यक्ष पाहणी
मागील तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाच्या अनुषंगाने नवी मुंबईच्या महापौर श्रीमती सुजाता पाटील यांनी बेलापूरपासून दिघ्यापर्यंत महापालिका क्षेत्रात विविध विभागांतील सखल भागात पाणी साचण्याच्या ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी शहर अभियंता श्री आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ अजय गडदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दुपारी 1.15 वा. सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार नेरूळ एल पी उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी साठलेले होते. त्या ठिकाणी शुभांगी बलखंडे, वय वर्ष 17, गांधीनगर, नेरूळ एमआयडीसी तसेच उज्वला वाघ, वय वर्ष 19, शिरवणे गाव, सेक्टर 1, नेरूळ या दोन मुलींना विजेचा झटका लागला आहे. त्या दोन मुलींना डी वाय पाटील रुग्णालय नेरूळ या ठिकाणी उपचारार्थ नेण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून आता त्या महानगरपालिकेमार्फत फोर्टिस रुग्णालय, वाशी येथे वैद्यकीय निगराणीखाली उपचार घेत आहेत. महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी या दोन्ही मुलींची व त्यांच्या कुटुंबीयांची लगेचच भेट घेत त्यांना धीर दिला आणि विजेचा शॉक नेमका कोणत्या विद्युत तारेच्या संपर्कात पाणी आल्यामुळे लागला याची तत्परतेने तपासणी करण्याचे निर्देश दिले.
आज दुपारी भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने महानगरपालिका क्षेत्रातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन मदतकार्य व्यवस्था करण्यात आली होती तसेच पाणी उपसा पंपांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
अशा भरतीच्या काळात पाणी साचलेल्या सखल भागातील बेलापूर ते दिघा येथील विविध ठिकाणांना भेटी देत महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी तेथील स्थितीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व अशा ठिकाणी पाणी उपसा पंपांची संख्या वाढवून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी अधिकारी, कर्मचारी दक्षतेने कार्यरत राहतील असे नागरिकांना आश्वस्त केले.
ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचते त्या ठिकाणांवर तातडीने रस्त्याच्या कडेचे चर खोदून व वॉटर एन्ट्री मोकळ्या करून पाणी वाहते करण्याची व्यवस्था करावी असे निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे नाल्यांमध्ये प्लास्टिक व इतर कचरा अडकून ते तुंबू नयेत या दृष्टीनेही दक्षता घेण्याची व अडकलेला कचरा नियमित साफ करण्याची सूचना करण्यात आली.
आज 1 जुलै रोजी सकाळी 8.30 ते सायं. 6.30 वा. पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 105.46 मिमी पावसाची नोंद झालेली असून बेलापूर विभागात 139.40 मिमी, नेरूळ विभागात 65.40 मिमी., वाशी विभागात 57.60 मिमी., कोपरखैरणे विभागात 102.20 मिमी., ऐरोली विभागात 128.40 मिमी, आणि दिघा विभागात 139.80 मिमी. पर्जन्यवृष्टी नोंदविली गेली आहे. यावर्षी आत्तापर्यंत नमुंमपा क्षेत्रात 542.33 मिमी. इतकी पर्जन्यवृष्टी झालेली आहे. त्याचप्रमाणे मोरबे धरण क्षेत्रातही 1 जुलै रोजी सकाळी 8.30 वा. पर्यंत 270.80 मिमी. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे.
मोरबे धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे याची चिंता व्यक्त करीत आपण सारे जण पावसाची आतुरतेने वाट बघत होतो. मात्र आता पाऊस आल्यानंतर मोरबेची पातळी वाढत आहे याबद्दल समाधान व्यक्त करतानाच पावसामुळे पाणी साचून नवी मुंबईतील नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात असून महानगरपालिकेमार्फत क्षेत्रीय स्तरावर कशा पध्दतीने मदतकार्य सुरू आहे याची पाहणी करण्यासाठी आज ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या असल्याचे सांगत महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी महानगरपालिका दक्ष असल्याचे सांगितले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times