Breaking News
संजयकुमार सुर्वे
बार्क संस्थेचे माजी अध्यक्ष पार्थो दासगुप्ता यांचे रिपब्लिक भारत चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सोबतचे व्हाट्सअप वरील झालेले चॅट मुंबई पोलिसांनी नुकतेच न्यायालयात दाखल केले. या आरोप पत्रातील पार्थो दास आणि अर्णब यांच्यातील चॅट व्हायरल झाल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. अर्णब गोस्वामी यांचे चॅट मधील संभाषण पाहिले की त्यांना देशात घडलेल्या अनेक घटनांबाबत त्या घडण्या अगोदर माहिती असल्याचे निदर्शनास आल्याने त्यामधील गंभीरता वाढली आहे. प्रखर देशभक्ती आणि राष्ट्रवाद याचा अनुप्रास धरणार्या गोस्वामी यांची खरी देशभक्ती मुंबई पोलीसांनी उघड केल्याने मुंबई पोलिसांच्या लाठित आवाज नसतो याची प्रचिती आता अर्णबला नक्कीच आली असेल.
देशात सध्या राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती यांचे वारे जोरात वाहत असून त्याची व्याख्या मात्र विद्यमान सरकारला अभिप्रेत असलेल्या परीभाषेतच लोकांच्या माथी मारली जात आहे. यामध्ये सर्वात जास्त कोणाचा सहभाग असेल तर तो भारतीय इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचा. या माध्यमांनी गेल्या सहा वर्षांत जो बाजार ‘प्राईम टाईम’ आणि ‘सबसे तेज खबर’ च्या नावाखाली मांडला आहे त्यामुळे आज मीडियावरील लोकांचा विश्वास डळमळीत होताना दिसत आहे. विद्यमान घटनांमधील सत्यता आणि सरकारच्या कामातील कमतरता व त्रुटी समाजापुढे मांडून लोकांचे बौद्धिक करणे हे खरेतर प्रसारमाध्यमांचे काम. पण हल्ली प्रसार माध्यमांचा वापर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून सत्य परिस्थिती बाबत गोंधळ उडवून देणे आणि समाजामध्ये जातीयतेचे विष पेरणे या एकाच अंगाने होताना दिसत आहे. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आणि गंभीर समस्या आ वासून उभ्या असताना त्यावर प्राइम टाईम मध्ये चर्चा न करता एखाद्या फडतूस नेत्यांचे वक्तव्य सिलेक्टिव्हली उचलून त्यावर चर्चा करताना आताचा मीडिया दिसत आहे. त्यामुळे लोकांपर्यंत बातमीतील खरे तथ्य पोहोचत नसल्याने लोकांकडून कोणत्याही घटनेबाबत मत व्यक्त होताना दिसत नाही. एखादा समाज विचारपूर्वक बधीर केला जावा आणि प्रश्न विचारण्या पासून त्याला परावृत्त केले जावे किंवा हा समाज जातीपातीच्या धर्माधर्मा च्या भिंतीतच अडकून गुलाम व्हावा या अनुषंगाने भारतातील सध्या वातावरण आहे. त्याच अनुषंगाने सरकार व त्यांचा गोदी मीडिया यांचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे.
मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणून प्रसारमाध्यमे आपली लोकप्रियता दाखवण्यासाठी टीआरपीचा कसा वापर करतात किंवा बेकायदेशीरपणे टीआरपी कसा वाढवतात हे भारतीय जनतेला दाखवून दिले. बार्क या संस्थेच्या अधिकारी व कर्मचार्यांना हाताशी धरून त्यांना पैसे देऊन कशा पद्धतीने हा घोटाळा सुरू होता याची उकल मुंबई पोलिसांनी केल्याने देशभक्त आणि राष्ट्रवादी पत्रकारांचे खरे चेहरे देशापुढे आले. ज्यावेळी अर्णब गोस्वामी या कथित पत्रकाराला मुंबई पोलिसांनी अटक केली त्यावेळी केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांनी केलेल्या ट्विटरवरून या पत्रकाराला कोण कोण सपोर्ट करत आहे हे दिसून येते. त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट सारखी संस्था अर्णब गोस्वामीला जामीन मंजूर करते त्यावर सुप्रीम कोर्टाच्या बार कौन्सिलने घेतलेले आक्षेप यावरून ह्या माणसाची हात कुठपर्यंत पोहोचलेले आहेत याची जाणीव होते.
टाईम्स नाऊ मध्ये प्राइम टाइम शो करणार्या अर्णब गोस्वामी यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आरडाओरडा करत स्वतःचे म्हणणे खरे करत व समोरच्याला बोलून देणे हि या पत्रकाराची खासियत. मोदी सरकार स्थापन झाल्यावर टाइम्स नाऊ मधून राजीनामा देऊन अर्णबने रिपब्लिक टीव्ही चॅनल अल्पावधीत सुरू केले. या टीव्ही चॅनेलमध्ये पैसा कोणाचा लागला हे पाहिले तर सरकारमधील एका नेत्याचा असल्याची चर्चा प्रसार माध्यमात आहे. मोदी सरकारला हवे असलेली देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांना देऊ शकतो त्याचबरोबर विरोधकांनाही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून उघडे करू शकतो हे जाणवल्यावर त्यांनी विद्यमान सरकारच्या मदतीने आपला प्रसार माध्यमाचा खेळ सुरू केला. सुनंदा पुष्कर केस किंवा इतर महत्त्वाच्या न्यायालयीन प्रकरणात अर्णब गोस्वामी त्याच्या प्राईम टीव्ही मध्ये सादर करत असलेले पुरावे पाहिले तर जाणवते की सरकारचे पाठबळ असल्याशिवाय या प्रकारचे पुरावे कोणताही पत्रकार सादर करू शकत नाही. विरोधकांना नामोहरम करण्याची संधी सरकारच्या खांद्यावरून बार उडवून देऊन साधत होती त्याबदल्यात अर्णबला हवे असलेले सहकार्य सरकारकडून एस आणि एम च्या माध्यमातून मिळत असल्याचे त्याच्या चॅटवरून सिद्ध होते.
बालाकोट प्रकरण घडण्याच्या तीन दिवस आधी अर्णब गोस्वामी यांनी बार्कच्या अध्यक्ष बरोबर केलेले चॅट मुंबई पोलिसांनी उघड केल्यावर त्याला भारतीय संरक्षण खात्यातील बरीच माहिती असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे विरोधकांनी आता अर्णब गोस्वामी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केल्याने पत्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रसिद्ध झालेल्या चॅटमध्ये तो पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांबाबत सहानुभूती व्यक्त न करता मोदी सरकारला त्याचा निवडणुकीमध्ये कसा फायदा होईल याबाबत पार्थो दास यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे. म्हणजे ज्या देशभक्तीची मशाल तो टीव्हीवरील कार्यक्रमात तेवत ठेवतो त्याविरुद्ध मात्र त्याची करणी उघड झाल्याने देशभरात संतापाची लाट उठली आहे. वरील चॅटमध्ये त्याने एस आणि एम यांची अप्रत्यक्ष नावे घेऊन आपल्याला या दोन सांकेतिक व्यक्तींपासून कसा सपोर्ट आहे हे दाखवून दिले. बरोबर त्यांने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, स्व. अरुण जेटली यांच्यावर केलेली वक्तव्ये भाजपचाही डोळ्यात अंजन घालणारी आहेत.
पालघर येथील साधूंच्या हत्याकांडापासून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला टार्गेट करण्याच्या नादात त्याने मुंबई पोलिसांनाही अंगावर घेतले. आपल्या प्राईम टाईम कार्यक्रमात मुंबई पोलिसांना मठा पोलीस म्हणून वारंवार हिणवले, परतू भगवान के लाठी मे आवाज नही होती त्याचप्रमाणे पोलिसांच्याही लाठीत आवाज नसतो ती पाठीवर पडल्यावर त्याची भेदकता जाणवते, तशीच अवस्था आज अर्णब याची मुंबई पोलिसांनी केली आहे. टीआरपी घोटाळ्यात चौकशीत थोडेसे धागे-दोरे
रिपब्लिक टीव्ही च्या विरोधात मिळाल्यावर त्यांनी सर्वात प्रथम बार्कच्या माजी अध्यक्ष पार्थो दास गुप्ता याला अटक केली त्यानंतर रिपब्लिक टीव्ही च्या व्यवस्थापकाला ही अटक करून मुंबई पोलिसांचा खाक्या दाखवला. मुंबई पोलिसांनी न्यायालयात तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करताना त्यात पाचशे पानांचे अर्णब आणि दास गुप्ता यांच्या सोबतचे व्हाट्सअप चॅट सादर करून याच्या मुसक्या बांधण्याचे बाकी ठेवले आहे. अर्णब आणि पाथोर्र् दास यांचा चॅट मसाला प्रसिद्ध झाल्यावर त्याची तिखट भाजप नेत्यांना आणि त्यांच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना एवढे झोंबले आहे की त्यांची पूर्ती बोलतीच बंद झाली आहे. छोट्या छोट्या कारणांवरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणारे भाजपा नेते महाराष्ट्रातून तर गायब झाल्यासारखे वाटत आहेत. अर्णब मुंबईतून गायब असून या प्रकरणातून वाचवण्यासाठी आपल्या नेत्यांचे उंबरठे दिल्ली यूपी मध्ये झिजवत असल्याचे प्रसारमाध्यमातील बातम्यांवरून कळतते. ‘पूछता है भारत’ म्हणून प्राइम टाईम मध्ये ओरडणारा हा कथित भांड पत्रकार आता मुंबई पोलिसांमुळे ‘धुंडता हे भारत’ या कार्यक्रमाचा भाग झाला आहे. मुंबई पोलिसांना स्कॉटलंड यार्ड ची उपमा का दिली जाते याचा अनुभव आता अर्णब घेत असेल कारण मुंबई पोलिसांच्याही लाठीत आवाज नसतो..
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times