Breaking News
कल्याण/वसई/पालघर: दि. ०४ जून २०२५
महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन राज्यभरात १ ते ६ जून दरम्यान वीज सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. सप्ताहाच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी मंगळवार व बुधवारी (०४ जून) कल्याण परिमंडलात विविध ठिकाणी निबंध व चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.
मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत असून अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत विविध माध्यमातून वीज सुरक्षेचा जागर करण्यात येत आहे. अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांच्या उपस्थितीत कल्याण मंडल एक अंतर्गत कल्याण पूर्व व पश्चिम तसेच डोंबिवली विभागात विविध ठिकाणी निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर उंबर्डे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना तर तेजश्री इमारतीतील प्रशिक्षण केंद्रात कर्मचारी व पाल्यांना वीज सुरक्षेचे धडे देण्यात आले.
अधीक्षक अभियंता विजय फुंदे यांच्या उपस्थितीत कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर एक आणि दोन, बदलापूर, कल्याण ग्रामीण विभागात महावितरण कर्मचारी व पाल्य तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वीज सुरक्षेबाबत चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तर अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसई मंडलातील वसई व विरार विभागात तसेच पालघर मंडलात विविध ठिकाणी तसेच शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धांच्या माध्यमातून वीज सुरक्षेचा जागर करण्यात आला.
वसुंधरा दिनानिमित्त गुरुवारी (०५ जून) परिमंडलातील सर्वच दहा विभाग कार्यालय स्तरावर वीज सुरक्षा व बचत विषयी रॅली काढण्यात येणार आहे. तर ६ जून रोजी सकाळी परिमंडलातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्र वीज सुरक्षेबाबत प्रतिज्ञा घेणार आहेत. याच दिवशी महावितरणचा २०वा वर्धापन दिन सर्व कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
Tejal Khanvilkar