Breaking News
इंदापूर : पिढ्या न पिढ्या काबाडकष्टाने खचलेला, पिचलेला महाराष्ट्रातील मराठा समाज लेकराबाळांच्या भवितव्याच्या चिंतेपोटी आरक्षणासाठी एकत्र आला आहे. मराठ्यांचे हे आंदोलन रोखण्याची कोणामध्येही धमक राहिलेली नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाने सरकार जेरीस आलेले आहे. उग्र आंदोलनाला माझे समर्थन नाही. त्यामुळे जाळपोळ, उद्रेक करू नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी शनिवारी इंदापूर येथे मराठा आरक्षण आंदोलन सभेत केले. आत्महत्या केल्या तर, आरक्षण द्यायचे कोणाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जरांगे म्हणाले की, ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांचे बांधव आहेत. ओबीसींचे आम्ही आरक्षण घेणारच नाही. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये विदर्भ, कोकण, नाशिक पट्टा, नगर भागातील सुमारे सत्तर टक्के मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण आहे. आता केवळ उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाडा एवढाच प्रश्न बाकी आहे. आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने आपले काम दाखवून तातडीने आम्हाला आरक्षण मिळवून द्यावे. अन्यथा यापुढेही आंदोलनाचा लढा असाच सुरू ठेवण्यात येईल. आंदोलनाची दिशा रविवारी (22 ऑक्टोबर) ठरवण्यात येईल. मराठा समाज अडचणीमध्ये आहे. आरक्षणासाठी, न्याय हक्क मागण्यासाठी मराठ्यांची आता लाट आली आहे. ऊन, वारा, पाऊस आता बघायचा नाही. न्याय दिल्याशिवाय आता मागे हटायचं नाही. आजपर्यंत झालं ते झालं. मराठा समाजाने आता तरी भानावर यावे, असे आवाहनही जरांगे यांनी या वेळी केले.
मनोज जरांगेंच्या मागणीला माझी मान्यता नाही : रामदास कदम
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. ते राज्यात विविध ठिकाणी जाऊन जाहीरसभा घेत आहेत. त्यांच्या सभेला मोठ्या संख्येनं लोक जमा होत आहेत. अशी एकंदरीत परिस्थिती असताना भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध केला आहे. 96 कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं. यानंतर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही कुणबी प्रमाणपत्राला विरोध केला आहे.
सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मनोज जरांगे यांच्या मागणीला माझी मान्यता नाही. मी त्यांच्या विरोधातला आहे. कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, हे मी दाव्याने सांगू शकतो, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मराठा आरक्षणावर भाष्य करताना रामदास कदम म्हणाले, सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मनोज जरांगेंची जी मागणी आहे, त्याला माझी मान्यता नाही. मी त्या मागणीच्या विरोधातला आहे. मला माहीत आहे, विदर्भात कुणबी आणि मराठ्यात सर्व व्यवहार चालतात. पण कोकणात कुणबी आणि मराठा यांच्यात रोटी-बेटीचा व्यवहार चालत नाही, याची कल्पना मनोज जरांगेंना नाही. त्यांचा सर्व महाराष्ट्राचा आणि कोकणाचा तेवढा अभ्यास नाही. त्यामुळे कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, हे मी दाव्याने सांगतो.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले, मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे. जरांगे-पाटील मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगतात. पण, तसं काही नाही. जरांगे-पाटलांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे. मात्र, जरांगे-पाटील कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही, असं बोलत आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही. मी मराठा असून, आयुष्यभर कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. 96 कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times