Breaking News
सोलापूर : बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हायला हवी. त्यासाठी काही हजार कोटी खर्च होणार असेल तरी चालेल; पण त्यातून ओबीसी, मागासवर्गीय, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक आणि खुल्यावर्गाची नेमकी स्थिती समाजासमोर स्पष्ट होईल. त्यानुसार पुढे त्या त्या जातींच्या संख्येच्या प्रमाणात विकासासाठी आर्थिक तरतूद करता येणे शक्य आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आग्रहाने मांडला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार सकारात्मक असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.
अलिकडे आपण राजकीय भूमिका घेऊन राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रातील महापुरूषांच्या विचारांशी तडजोड न करता आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो आहोत. सरकारमध्ये असल्यानंतर लोकांचे प्रश्न सोडविता येतात. बहुजन समाजासह वंचितवर्ग, अल्पसंख्याक समाजाला मदत करण्यासाठीच आपण सत्तेत सहभागी झालो आहोत. विकास साधायचा तर काळ कोणासाठी थांबत नसतो, असेही ते म्हणाले.मराठा समाजाप्रमाणे धनगर व इतर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. पण मराठा समाजातील तरूणांची प्रश्न समजून घेण्याची मानसिकता राहिली नाही. आपण कोणालाही नाउमेद करणार नाही. ओबीसींचे 52 टक्के आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचे 10 टक्के याप्रमाणे 62 टक्के आरक्षणाला धक्का न लागू देता उर्वरीत 38 टक्क्यांतून मराठा समाजाला कसे आरक्षण देता येईल, यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांच्यासह इतरांची भाषणे झाली. आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, पंढरपूरच्या सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती. रणजितसिंह शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
अजित पवारांना दाखविले काळे झेंडे
माढ्यात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या 23 व्या गळीत हगामाच्या शुभारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार चालढकल करीत आसल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत काळे झेंडे दाखविले. त्यावेळी थोडावेळ गोंधळ उडाला. परंतु पोलिसांनीही तेवढाच संयम दाखविला. त्यानंतर मराठा समाजाच्या पाच मुलींनी व्यासपीठावर जाऊन अजित पवार यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन सादर केले.
शिंदेगटाएवढीच मंत्रिपदे राष्ट्रवादीला द्या
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मुख्यंमत्री एकनाथ शिंदे गटाएवढीच मंत्रिपदे राष्ट्रवादीलाही मिळावीत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.तीन पक्षांच्या सरकारमध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. तर शिंदे गट आणि आपल्या राष्ट्रवादी गटाच्या आमदारांची संख्या समसमान आहे. आमदारांच्या पक्षनिहाय संख्येचा विचार करून शिंदे गटाएवढीच मंत्रिपदे मिळावीत, अशी मागणी त्यांनी केली. जर मंत्रिपदे मिळाली तर माढ्यातून सलग सहावेळा निवडून आलेले आमदार बबनराव शिंदे यांना निश्चितपणे संधी देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शरद पवारांना अजित पवारांचे खडेबोल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकमेकांपासून विलग झाल्यानंतर उभयतांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना माढ्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचा थेट नामोल्लेख टाळून त्यांना खडेबोल सुनावले. राज्यात लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. आपण गेली 30-35 वर्षे राजकारणात असताना वरिष्ठांनी जे सांगितले तेच पाळत गेलो. वरिष्ठांनी 2014 साली राज्यात भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला असता त्यावेळीही आम्ही गप्प होतो. अनेकदा अशा घटना घडल्या असून त्याचे आपण साक्षीदार आहोत. आपणांसह दिवंगत आर. आर. पाटील, मधुकर पिचड, छगन भुजबळ, डॉ. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील अशा सर्व ज्येष्ठ त्यात होते. ही बाब निर्विवाद सत्य आहे. आज आमच्या 45 आमदार भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतात ही गोष्ट तेवढी साधी नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी स्पष्ट करीत शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times