Breaking News
रोहित शर्माच्या एकाच वादळी खेळीसह सर्वांनाच प्रभावित केले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या बॅटने विक्रमी खेळी पाहायला मिळाली. रोहित शर्माने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत सर्व गोलंदाजांविरुद्ध हल्लाबोल केला. या खेळीदरम्यान रोहितने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही मोडला. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद अश्रफुलच्या नावावर होता.
रोहित शर्माने आपल्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर मोहम्मद अश्रफुलचा १७ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. बांगलादेशचा माजी कर्णधार मोहम्मद अश्रफुलने २००७ च्या टी-२० विश्वचषकात २० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात रोहित शर्माने १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ४१ चेंडूत एकूण ९२ धावा केल्या. यादरम्यान त्याने तब्बल ७ चौकार आणि ८ षटकार लगावले.
१९ चेंडू – रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२४
२० चेंडू – मोहम्मद अश्रफुल विरुद्ध वेस्ट इंडिज, २००७
२१ चेंडू – महेला जयवर्धने विरुद्ध केनिया, २००७
रोहित शर्माने टी-२० विश्वचषकात टीम इंडियासाठी तिसरे जलद अर्धशतकही ठोकले आहे. यापूर्वी केएल राहुलने २०२१ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याचबरोबर भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. २००७ च्या टी-२० विश्वचषकात त्याने १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील या सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम अजूनही भारताच्या युवराज सिंगच्या नावावर आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या आहेत. सामन्याच्या सुरूवातीला दुसऱ्या षटकात संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली शून्यावर बाद झाला. पण रोहित आणि ऋषभ पंत यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. रोहितच्या फटकेबाजीमुळे भारताला स्पर्धेच्या इतिहासातील एखाद्या संघाने सर्वात जलद १०० धावा करण्याचा विक्रम करता आला.
१२व्या षटकात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने रोहितचा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम चुकला. रोहितने अवघ्या ४१ चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने ९२ धावा करून टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. विराट कोहली आणि बाबर आझमला मागे टाकत टी-२० मध्ये सर्वाधिक धावा रोहितने आपल्या नावे केल्या आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
रोहित शर्मा – १४९ डावांमध्ये ४१६५ धावा
बाबर आझम – ११६ डावांमध्ये ४१४५ धावा
विराट कोहली – ११५ डावांमध्ये ४१०३ धावा
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times