Breaking News
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध
सोलापूर: संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट दौऱ्यावर असताना त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. तसेच कारमध्ये आणि रस्त्यावर त्यांना मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. हा प्रकार शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा संशय आहे.
गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन चे कार्यकर्ते त्यांच्यावर संतप्त होते. यापूर्वी त्यांनी गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. त्यामुळे आजच्या कृत्याच्या संशयाची सुई देखील शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडे जात आहे.
गायकवाड हे संभाजी ब्रिगेड आणि फत्तेसिंह शिक्षण संस्था यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे आले होते. या कार्यक्रमात त्यांचा सत्कार देखील आयोजित करण्यात आला होता. ते कार्यक्रम स्थळी पोहोचत असतानाच कार्यकर्त्यांचा जमाव त्यांच्या दिशेने आला. त्यांनी गायकवाड यांना घेराव घातला आणि तोंडाला काळे फासले. त्यानंतर गायकवाड हे आपल्या कार मध्ये जाऊन बसले. कारमध्ये घुसून व रस्त्यावर ओढून काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.
दरम्यान प्रवीण गायकवाड यांनी या घटनेवर आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “माझ्यावर अचानकपणे हल्ला करण्यात आला. मला मारहण्याचाही प्रयत्न केला गेला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, डॉ. गौरी लंकेश यांच्या हत्या याआधी याच विचारसरणीच्या लोकांनी केली होती. आता याच विचारसरणीने माझ्यावरही हल्ला केला आहे. आमचा विचार राज्यघटनेला अभिप्रेत असलेला आहे. देशात मानवता प्रस्थापित करण्यासाठी संभाजी ब्रिगेड काम करत आहे आणि करत राहिल. मी एवढेच म्हणेण ही शेवटाची सुरुवात आहे. आज माझ्या हत्येचा प्रयत्न केला गेला. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे.”
पुरोगामी विचारवंत, शिवश्री प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणा-या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा: हर्षवर्धन सपकाळ
सरकारी पाठिंब्याने महाराष्ट्रात वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करत आहेत.
महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा सुळसुळाट वाढला आहे. सरकारी पाठिंब्याने वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रविण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतिक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
प्रविण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील गुंडगिरी थांबत नाहीय हे सत्य आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंड आणि माफियाचे असा प्रश्न पडावा इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय गायकवाड यांच्यासारखे सत्ताधारी पक्षाचे आमदारच कायदा हातात घेवून सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करतात. पण पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीत. गुंड आणि माफियांना सत्ताधारी पक्षाचे संरक्षण असून त्यांच्या मदतीने विरोधी विचारांच्या लोकांवर हल्ले करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेषत: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर कार्य करणा-या कार्यकर्त्यांना जाणिवपूर्वक लक्ष केले जात आहे. हे हल्लेखोर गुंड सरकारच्या अर्बन नक्षलींच्या व्याखेत बसत नाहीत का ? यांच्यावर जनसुरक्षा कायद्याखाली कारवाई होणार का?
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times